Monday 14 January 2013

'पंचमहाभूत'.. निघोज




उकळत्या 'अग्नि'रसाचे काठीण्य भेदून..
खळखळत, उसळता 'जल'प्रवाह..
कडेकपारीत मग गुंजतो 'मरुतां'चा स्वर..
'धरती'ही उलगडते एक एक मुद्रा..
'आकाशी' सभागृहात !!

अंकुर


दूर दिसणाऱ्या करपट गवताच्या कुरणाखाली शुष्क झालेल्या काळ्या मातीतील ती छोटी भेग त्याला कित्येक दिवस खुणावत होती. परिपक्व होऊन त्या विशाल वृक्षापासून मुक्तता मिळून कित्येक दिवस लोटले होते. मात्र, सुकलेल्या पानांच्या आडोशामागे तो अशाप्रकारे बंदिस्त झाला होता की, त्या पानांच्या जाळीदार भिंतींमागे घडणारा आजन्म कारावासच. सूर्य या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत जास्तोवर येणारे आगीचे झोत सहन करत आता अंगावरील इवलेसे कवचही करपून गेलेले. रात्री सुकलेल्या पानांच्या जाळीपलिकडे आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांचाच काय तो आधार. तरीही आशा होती ही तपस्या कधीतरी फलद्रूप होणार..

अखेर तो दिवस आला. डोक्यावर तळपणारा सूर्य इवल्याशा कवचाचे शेवटचे कणही करपवू लागला. अंकुरण्याआधीच जाळीदार कारागृहात आपल्या अंताची चाहूल लागलेल्या त्या बीजाला दूर काळ्या मातीतील भेग अस्पष्ट होताना दिसू लागली. डोळ्यासमोर अंधारी आली. कारागृहात काळोख पसरला.. सूर्य दिसेनासा झाला, जाळी पलिकडची ती भेग आणि जाळीही.. कदाचित हा जन्म स्वप्नवतच असेल..

इतक्यात कानावर सळसळ आली. हळूहळू तीव्रता वाढू लागली. सुकलेल्या पानांचे कारागृहही हादरू लागले. जाळीतून पुन्हा काहीतरी अस्पष्ट दिसू लागले. दूरवर धूळीचे लोट वाहत होते. काळ्या जमिनीवरील ते करपटलेले गवत वाऱ्याची दिशा दाखवू लागले. वर आकाशात पहिले तर सूर्याला एका प्रचंड कृष्णमेघाने ग्रासलेले. वारा घोंघावू लागला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला धक्के देऊ लागला. असंख्य सुकलेल्या पानांचे थवे आजूबाजूने वेगाने दूर दूर जात असल्याचे दिसत होते..

एकाएकी त्या बीजाच्या शरीरात विजेसारखी ऊर्जा प्रकटली. पुन्हा आशा पल्लवित झाली. एवढ्यात वाऱ्याच्या जोरदार धडकेने ते सुकलेले जाळीदार कारागृह हवेत उडाले. थोड्या अंतरावर त्याच्या भिंती कोसळल्या.. त्यांचेही थवे दूर अस्पष्ट होताना दिसले. मात्र, त्या बीजाच्या अंगावरील कवचाची राख कधीच उडून गेलेली. अगदी पंख छाटल्याचाच भास होत होता. जन्माला आल्यावर वाटले होते, वाऱ्याची एखादी झुळूकही पुरेल. या कवचाच्या पंखांमुळे अलगद उडत त्या भेगेपर्यंत सहज पोहोचता येईल. मात्र, आता पंखांविना एवढा मोठा पल्ला गाठायचा कसा? एका कारागृहातून तर मुक्तता झाली.. पुन्हा दुसऱ्यात अडकलो तर?

मात्र, इतक्या दिवसांची कठोर तपस्या फळाला आली होती. ज्या वाऱ्याने त्या कारागृहाचे थवे उडवले त्याच वाऱ्याने त्या इवल्याशा जीवाला त्याच्या इच्छीत स्थळापर्यंत सुखरूप पोचवले. त्या अंधाऱ्या गर्भात त्याला जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागेत आल्याची जाणीव झाली. मन भरून आले. भेगेतून दिसणाऱ्या फटीतून मग वाराही बीज सुरक्षित आहे ना याची खात्री करून गेला. त्याच फटीतून दूर उंच आकाशात काळ्या मेघांची दाटी झाली होती. गडगडून तेही जणू सुटकेबद्दल त्याचे अभिनंदन करत होते. इतक्यात वेषांतर करून त्यांनी थेट जमिनीवर कोसळायला सुरुवात केली. फटीतून दिसणाऱ्या आकाशातून एक बिंदू मोठा होताना दिसला आणि क्षणात भेगेतून वेगाने प्रवेश करत त्याने बीजाला आलिंगन दिले. अनेक दिवस होरपळून निघालेल्या त्या शरीराला त्यावेळी झालेला आनंद प्रणयाच्या परिपूर्णतेचाच होता. पाहता पाहता जमिनीवरून पाण्याचे लोट वाहू लागले आणि भेगेतून दिसणारे आकाश अस्पष्ट होत गर्भाचा मार्ग बंद झाला..

एके सकाळी वाऱ्याची झुळूक त्या भागातून फिरत होती तिला काळ्या मातीत एक अंकुर फुटलेला दिसला. आनंदाने जवळ जाऊन तिने अलगद त्या अंकुराला कुरवाळले.. अंकुरही गालातल्या गालात हसला..

- मयुरेश (१८ एप्रिल, २०१२)       






















विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे 
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..

तीन फुटी खिडकीतून दिसत असेलही आकाशाचा निळा तुकडा  
रात्री त्या काळ्या तुकड्यात इच्छा पूर्ण करणाऱ्या उल्काही दिसत असतील कदाचित..  
वर्षभर खिडकीतून भेटत असतील ऋतू.. 
चौकटीत इथे असं बसून थंडीच्या लाटेत गारठत असशील   
आणि चिंब भिजतही असशील मॉन्सूनच्या पावसात  ...

पण क्षितिजाचा परिघ आणि आकाशाच्या घुमटाची खोली 
तुझ्या द्विमितीय चौकटीतून कधी जाणवली आहे तुला?
ये जरा अशी बाहेर.. बघ तुलाही आणखी एक मिती आहे 
तुलाही खोली आहे..

विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे 
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..

- मयुरेश 
१४ जानेवारी, २०१३      

Wednesday 17 August 2011

पुनश्च क्रांती


अनेकदा मला स्पष्टपणे दिसतं..
संधीप्रकाशात हजारो तलवारी एकमेकींना भिडल्या आहेत, जणू हजारो घंटांचा नाद एकाचवेळी व्हावा..त्यांच्या घर्षणाच्या ठिणग्यांतून वीज चमकल्याप्रमाणे रणांगण निमिषार्धासाठी प्रकाशते.. त्यात दिसतात भान हरपून तलवारीशी एकरूप होऊन परकीय आक्रमकांवर तुटून पडलेले माझेच भाऊबंध. रणांगणाच्या धुळीच्या ढगात सुरु आहे रक्ताचा वर्षाव... ज्या मातीतून आलो त्याच मातीशी एकएक करून एकरूप होणारे तिचे चिरंजीव.. असंख्य वारांमुळे छिन्न- विच्छिन्न माझ्या शरीराचे अवयव मलाच ओळखता येत नाहीयेत. रक्ताने भिजलेल्या तलवारीला जोडलेला तो माझा हातच असावा. वेदनांनी हार मानून माझ्या आधीच प्राण सोडलेला! डोळे, कान आणि मेंदू मात्र पूर्ण शक्तीनिशी वाट पाहतायत विजयी शंखनादाची.. सूर्यास्त जवळ आला आहे, चित्र अस्पष्ट होतंय.. तलवारींचे आवाज शांत होतायत.. एवढ्यात घोषणांचा उद्घोष सुरु झालाय.. दुरून शंखनादहि झाला. स्वतः घाम आणि रक्ताच्या मिश्रणाने भिजलेल्या सेनापतींनी विजयाची घोषणा केली. त्रिभुवन पादाक्रांत करायला निघालेल्या अलेक्झांडरला भारतीय मातीने अस्मान दाखवले. मातृभूमीचा जयघोष कानावर पडत असतानाच अंधारात मी तिच्याशी एकरूप झालो..

हे क्षणहि राहून राहून आठवतात..
सनई- चौघड्यांच्या मंगलमई स्वरात गडावर सर्वत्र लगबग सुरु आहे. नऊवाऱ्यान्मधील सुवासिनी हातात आरती घेऊन तयार आहेत. आज संपूर्ण गड स्वर्गासारखा सजला आहे. लहान- थोर, पुरुष- स्त्रिया, गरीब- श्रीमंत सर्व भेद विसरून या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत. देशभरातून आलेल्या नामवंत पुरोहितांच्या मंत्रोच्चारांचा धीरगंभीर आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमतोय. चारशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा आमचे स्वतःचे राज्य येत आहे.. स्वराज्य ! माझ्या डोळ्यासमोरून गेल्या काही वर्षांतील घटनांचा क्रम वेगाने सरकतो. रायरेश्वराच्या मंदिरात मशालींच्या प्रकाशात महाराजांच्या पाठोपाठ महादेवाला घातलेला रक्ताभिषेक. जीवाची परवा न करता शत्रूच्या ताब्यातील एक एक गड जिंकून त्यावर डौलाने फडकणारा भगवा.. जावळीच्या खोऱ्यात मुसळधार पावसात बेभान होऊन शत्रूची उडवलेली दैना.. शत्रूच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रचलेला तो गनिमीकावा.. स्वराज्याचे शिलेदार म्हणून घराघरातून मिळणारा तो मान- सन्मान.. खानाचा जिझिया भरता भरता आयुष्य गेलेल्या त्या सुरकुतलेल्या, थरथरत्या हाताचा तो आशीर्वाद.. त्या हिरवट पाणावलेल्या डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या अपेक्षा.. हर हर महादेव.. जय भवानी- जय शिवाजीच्या गर्जनांसह घरा- घरातून आलेल्या हजारो मावळ्यांनी व्यक्त केलेला निर्धार.. हे सर्व डोळ्यासमोरून गेल्यावर रायरेश्वरावर कापलेली उजव्या हाताची करंगळी माझ्याच अश्रूंनी भिजली आहे. अचानक सर्व नजरा माझ्याकडे रोखल्या गेल्या आहेत. मला काळात नाहीये हे असे का पाहतायत माझ्याकडे.. एवढ्यात माझ्या खांद्यावर उर्जेनी भरलेला स्पर्श जाणवला... मी वळून पहिले... महाराज !!! महाराज आपण ?? मी काही बोलायच्या आत स्वतः छत्रपतींनी आलिंगन दिले.. माझ्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले.. तोंडातून शब्दच फुटेनात, मनातून विचार गेले, कानातून श्रुती गेली.. धान्य जाहलो.. कृतार्थ जाहलो.. जिवंतपणीच मोक्षाचा अनुभव! समोर भगवा फडकत होता.. आजचे त्याचे रूप काही आगळेच आहे.. स्वराज्यात जो फडकत आहे! अश्रूही भगव्या रंगाने न्हाऊन निघाले..

या घटना तर नुकत्याच घडून गेल्याप्रमाणे मनात ताज्या आहेत..              
गेल्या पाच- सहा वर्षांतला घटनाक्रम लिहून पूर्ण होत आला आहे. जेलच्या या खोलीत फक्त दुपारी तीन तास प्रकाश येत असल्यामुळे त्या वेळेतच लिखाण करणे भाग आहे. बाजूला पुस्तकांचा ढीग लागला आहे. मी डायरीत भराभर उतरवतोय.. लवकरात लवकर हे जेलच्या बाहेर जाणे आवश्यक आहे.. आयुष्यातला सर्वात महत्वाचा चार वर्षांचा कालखंड लिहून काढला आहे.. कॉलेजमधले दिवस.. त्या काळात सहाध्यायी इंग्रज विद्यार्थ्यांनी केलेल्या अपमानानंतर त्यांना सर्वांनी मिळून दिलेला चोप.. एके दिवशी उपहारगृहाच्या भिंतीवर वाचलेले हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे आवाहनपत्र.. त्यानंतर जुन्या क्रांतीकाराकांशी झालेली ती भेट..       त्यांच्या काकोरीतील धरपकडीनंतर संघटना चालवण्यासाठी आम्हा तरुणांवर एकाएकी येऊन पडलेली जबाबदारी.. घरच्यांनी लग्नाचा तगादा लावल्यावर पळून जाऊन कानपूरला गणेश शंकर विद्यार्थींकडे घालवलेले दिवस.. त्यांच्या 'प्रताप' या वर्तमानपत्रात केलेली पत्रकारिता.. एक असाईन्मेंट म्हणून बिहारचा केलेला दौरा.. त्यात दुष्काळाचे, भुकेच्या बळींचे आणि त्याहूनहि भयाण इंग्रजी अत्याचाराचे झालेले संतापी दर्शन.. सर्व घटना कशा काल- परवा घडलेल्या.
अजूनहि आठवतीये यमुनेकाठची ती मीटिंग.. 'एचआरए'च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशाच्या विविध प्रांतातून आलेले क्रांतिकारक अनेक वर्षांनी एका झेंड्याखाली एकत्र येत आहेत.. तरुण भारताचं ते एक अनौपचारिक संमेलनच होतं. कॉंग्रेसच्या मिळमिळीत धोरणाचा विरोध हि त्या सर्वांमधील समानता असली तरी भूक, भयमुक्त, शिक्षित, आरोग्यसंपन्न, जाती- धर्मविरहित समाजाची संकल्पनाही सर्वांना पटलेली. त्यातूनच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच हिंदुस्तान सोशलीस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये (एचएसआरए) झालेलं रुपांतर.. 
यानंतर महिनोंमहिने सर्वांनी एकत्र घालवलेले कानपूर- लखनौमधील दिवस.. लाहोर- फिरोजपुरचे दौरे.. संघटनेची बांधणी.. पूर- दुष्काळामध्ये केलेलं कार्य. सर्वजण झपाटून काम करीत होते. वय असं होतं तरी किती.. एकोणीस- वीस. एकीकडे इंग्रजी अत्याचार वाढत असताना कॉंग्रेस मात्र, डोमेनियन स्टेटसची मागणी करीत होती. सायमन कमिशन आलेलं.. सायमनविरोधी प्रदर्शनात लाहोरमध्ये लालाजींवर झालेला लाठीहल्ला, त्यात त्याचं झालेलं निधन. आणि स्कॉटच्या हत्येने आम्ही घेतलेला बदला.. लाहोरमधून शिताफीने निसटून कलकत्ता- आग्र्यात सुरु राहिलेलं काम. ट्रेड डिसप्युट बिलाविरोधात आम्ही संसदेत केलेला धमाका.. त्यानंतरची धरपकड.. जेलमधले दिवस.. इंग्रजांकडून होणाऱ्या भेदभावाविरोधात उपोषणाचे हत्यार आणि त्याला देशातील नागरिकांकडून आजपर्यंत कधीही न मिळालेला असा अभूतपूर्व प्रतिसाद.. कालांतराने इतर साथीदारांच्या अटकेनंतर जेलमधेच सर्वांची पुन्हा झालेली भेट..
स्कॉट हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर तिघांना वेगळे करण्यात आले. बाहेर देश पेटला आहे. तरुण वर्ग 'एचएसआरए'ची भाषा बोलू लागला आहे. जे काम आम्हाला बाहेर असताना जमले नाही, ते आता शेवटची घटका जवळ येत असताना साध्य होत आहे. मनात विचार येतो शेवटी क्रांतिकारकाची भूमिका असते तरी काय.. हीच ना.. आपल्या सर्वोच्च समर्पणातून देशाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देणे.. एका आदर्शवादी चित्राचे स्वप्न दाखवणे आणि ते साध्य करण्यासाठी चैतन्य निर्माण करणे. हे जर साध्य होत आहे, तर माझा जन्म सार्थकी लागला आहे. याचसाठी तर होता हा जन्म. आयुष्य किती दिवसांचे याला काय महत्व.. जन्माचा हेतू साध्य झाला ना हे महत्वाचे.. पण अजूनहि खूप काही करायचे आहे.. ते विषमतामुक्त समरस समाजाचे, वैभवशाली भारताचे आदर्शवादी चित्र अजूनही अपूर्णच आहे. काही वेळा वाटतं आणखी काही दिवस मिळाले असते तर.. अजून खूप काही करता आलं असतं.. पण या जन्माचे दिवस कदाचित एवढेच होते..
डायरीवर कोणाचीतरी सावली पडली.. लिखाण थांबवून मी वर पहिले.. अरे जेलरसाहेब.. यावेळेला?..''शेवटची ऑर्डर आली आहे.." गंभीर भाव आणि दाटलेल्या गळ्याने त्यांनी हे शब्द कसेतरी उच्चारले.. जेल बाहेरून घोषणांचा आवाज सुरूच आहे. काही जणांना वाटतंय कि अजूनहि आम्ही सुटू शकू.. सूर्यास्ताबरोबर आमचा मुक्तीद्वाराकडील प्रवास सुरु झाला.. मनात कसलीही भीती नाही.. तिघांच्या एकत्र जाण्याने एक वेगळाच उत्साह संचारला आहे. जेलबाहेरील इन्क्लाब्च्या घोषणांमध्ये मग आमचाही आवाज मिसळतो. गंगे- यमुनेकाठी एकत्र गायलेली मातृभूमीची गीते अपोआप तोंडातून बाहेर पडू लागतात. आम्ही तिघे सोडून सर्वांचेच चेहरे पडलेले.. अखेर आमच्या लक्षापर्यंत पोचलोच.. गगनभेदी घोषणा झाल्यावर डोक्यावर काळी टोपी घातली जाते.. हात- पाय बांधलेले.. गळयाभोवतीचा दोर आवळला जातो.. थरथरत्या हातांनी जल्लाद आपले काम पार पाडतो.. पायाखालची फळी सरकते.. तिघेही काही फुट खाली कोसळतो.. मानेला हिसका.. काहीवेळ शरीराची हालचाल..तीही शांत होते.. काळोखात ते  वैभवशाली भारताचे चित्र तेवढं दिसतंय..

कोण आहे मी?
एक अस्वस्थ आत्मा!
काळे ढग दाटून आल्यावर शरीर धारण करणारा..
क्रांतीचे रणशिंग फुंकून चैतन्य फुलवणारा..
एक अदृश्य उर्जा आहे.. कंप नियंत्रित करणारी..
बेताल शक्तींना काबूत ठेवणारी..
अगदी निर्मितीपासून या मातीतच माझे अस्तित्व..
येथील नद्यांमधून मी प्रवाहित आहे, या आकाशातच मी विहारत आहे..
अमरत्वाचा वर असणाऱ्या मला प्राप्त आहे भावना, मातीशी एकरूपतेची आणि फक्त समर्पणाची!
युगानुयुगे मी जन्म घेतोय.. घेत राहीन.. लक्ष्यप्राप्तीनंतरच मुक्त होईन..

आकाशात पुन्हा काळे ढग दाटून आले आहेत.. विजा चमकत आहेत..
.. या मातीतूनहि एक वावटळ उठले आहे.. 
दऱ्या- खोऱ्यांतून.. नद्यांच्या पात्रांतून ते घोंघावत वाढत आहे.. विस्तारत आहे..
आता त्याचे एक वादळ झाले आहे.. त्यानेही गर्जना केली आहे..
..क्रांती..क्रांती !

- मयुरेश (२५ जून २०११)  


Tuesday 21 June 2011

२२ जून १८९७ ... २२ जून २०११



२२ जून १८९७ 

पावसाचे नुकतेच कुठे आगमन झाले होते. छतांमधून गळणारे पाणी आणि भिंतींना आलेली ओल काढण्यासाठी पेठांमधील वाड्यांची डागडुजी सुरु होती. पावसाळा नेहमीसारखाच असला, तरी हवामान नेहमीसारखे मुळीच नव्हते. यावेळी घरे स्वच्छ रहावीत, हवा खेळती राहावी यासाठी म्युनिसिपालटीकडून कडक नियम आखून देण्यात आलेले होते. शहरात गेले अनेक महिने प्लेग जो आला होता. सकाळी काखेत दुखल्यासारखं होऊ लागल्यावर, दुपारी गाठ येऊन ताप भारत असे. संध्याकाळी त्याचे प्रेत जाळून येईपर्यंत दुसऱ्याच्या काखेत गाठ.. हे चक्र वेगाने सुरु होते. शेकडोंच्या संख्येने दररोज मारणाऱ्यांची संख्या वाढत होती. पावसाचा ओलावा आणि पेठांमधील कुबट वातावरणामुळे प्लेगने चांगलेच हातपाय पसरले होते. असं एखादाच घर असेल, ज्या घरातील कोणावर या साथीमध्ये अंत्यसंस्कार झालेले नसतील.
लोक अक्षरशः हवालदिल झालेल्या अशा स्थितीत पुण्यात 'साथ नियंत्रणाचा कायदा' लागू केला गेला.. हा कायदा योग्य रीतीने लागू होतो कि नाही हे पाहण्यासाठी कमिशनरहि नेमला गेला.. नाव होते रैण्ड. शहराची निम्मी लोकसंख्या स्वर्गवासी झालेली, अनेकांनी पुणे सोडलेले अशा स्थितीत प्लेग नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आली. लोकांच्या आरोग्याची तपासणी करा, घरे स्वच्छ आहेत कि नाही ते पाहा, कोणाच्या काखेत गाठ आहे कि नाही तपासा, कोणी संशयित आढळले कि त्याला थेट दवाखान्यात दाखल करा.. असे निर्देश देण्यात आले. त्याच्या उद्देशाप्रमाणेच गोऱ्या सैनिकांनी ते मर्यादेत राहून ऐकले असते, तर गोष्ट वेगळी होती. मात्र, या त्यांनी शहरात उन्माद घातला. कोणाच्याहि घरात घुसून बायका- मुलींवर हात टाकायला सुरवात केली, स्वच्छतेच्या नावाखाली देव्हारे घराबाहेर फेकण्यात आले. अनेक ठिकाणी तर घरातील दाग- दागिनेही लुटले. सनातनी पुणेकरांना या गोष्टी रुचतील, तर नवलच. शहरातील गोऱ्यांचा उच्छाद सुरूच होता. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांना चांगलाच धडा शिकवणे आवश्यक होते. केसरी, सुधारकमधून मथळेच्या मथळे भरून सरकारच्या या कृतीच्या विरोधी मजकूर छापून यायला लागला. मुळातच क्रांतिकारी रक्त आणि छत्रपतींच्या संघर्षमय इतिहासाची जाणीव असणाऱ्या काही तरुणांच्या मुठी शहरात चाललेल्या या प्रकारांमुळे वळू लागल्या. टेकडीवर बसून केसरीचे सामुहिक वाचन झाल्यावर व्यायाम, लाठी- काठी, खड्गाचा सराव सुरु झाला. चिंचवड- पुणे धावत फेऱ्या तर नेहमीच होत. दरम्यान, शहरातील काही टग्यांना आणि काही 'गोऱ्या माकडांना' अंधारात चोप देऊन आपला राग व्यक्तहि करून झाला.
मात्र, एवढे पुरेसे नाही याची जाणीव त्यांना होती. शहरातील इग्रजांच्या उन्मादावर नियंत्रण आणायचे असेल, तर हवा होता एक सनसनाटी इशारा.. ठरलं.. थेट मुळावरच वार करायचा.. ज्याच्या पुढाकाराने हे होत आहे, त्या रैण्डलाच टिपायचा. सराव सुरूच होता, प्रयत्न करून पिस्तुलही मिळालं. लाठीकाठीच्या जोडीला नेमबाजी सुरु झाली. पाळत ठेवण्यात आली. तो दिसतो कसा, दिवसभर काय करतो, एवढ्यातले कार्यक्रम काय आहेत.. आणि योगायोगाने मुहूर्तही मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याचा. या निमित्ताने इंग्रजी राजवट पोचलेल्या ठिकाणी जगभर ही घटना मोठ्या दिमाखात साजरी होत होती. तशीच ती पुण्यातही होणार होती. गव्हर्नरतर्फे शहरातील इंग्रज अधिकाऱ्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मोठी आतिशबाजीही करण्यात येणार होती. रैण्डही या कार्यक्रमाला येणार होताच. गणेश खिंडीजवळ असणाऱ्या गव्हर्नर बंगल्यातील पार्टी आटोपली, की त्याला खिंडीत गाठायचे आणि तेथून थेट यमसदनी धाडायचे याची व्यूहरचना आखली गेली.
दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे कीर्तनकार हरि चापेकरांचे तिघे चिरंजीव त्यांचे सहकारी महादेव रानडे आणि खंडो साठे यांच्यासह रैण्डच्या मार्गाचा मागोवा घेऊन आले. रैण्डचा वेध घेण्याची जबाबदारी बाळकृष्णने उचलली. २२ जून, १८९७ चा सूर्य मावळला. चतुःशृंगीचे दर्शन झाले. आईकडे वर मागितला.. "आई अंबे, जगदंबे जातो सत्कर्मी वर दे.. रिपूदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे.." टेकडी उतरून खिंडीतल्या गजाननाचे दर्शन घेतले आणि प्रत्येकाने आपआपल्या जागा धरल्या. गव्हर्नरच्या बंगल्याकडे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या बग्ग्या येणे- जाणे सुरूच होते. त्यातली रैण्डची कोणती हे यांनी आधीच हेरून ठेवले होते. आज राणीच्या राज्यारोहणाच्या हिरकमहोत्सवानिमित्त होणारी अतिषबाजी पाहायला रस्त्यावर गर्दीही होती. अंधार दाटू लागला तशी रस्त्यावरची गर्दी कमी होऊ लागली. कार्यक्रम संपून एकेका इंग्रजी अधिकाऱ्यांच्या बग्ग्या कैम्पातल्या बंगाल्यांकडे परतू लागल्या. त्यात रैण्डची बग्गी दिसली की, 'गोंद्या आला रे..' अशी आरोळी द्यायचे निश्चित झाले.
काही बग्ग्या गेल्यावर घोड्याच्या टापांसह घुंगरांचा आवाज आणि चाबकाचे फटकारे ऐकू आले. बग्गीच्या कंदिलाचा मंद प्रकाश प्रखर होताना दिसला.. 'अरे हाच तो रैण्ड' असे मनात येताच.. एकाने जोरदार आवाज दिला.. 'गोंद्या आला रे..' बग्गी पिवळ्या बंगल्यावरून पुढे सरकताच बाळकृष्णने बाग्गीचा पाठलाग करून  पिस्तुलाचा चाप ओढला.. आणि बग्गीत बसलेल्या अधिकाऱ्याचा वेध घेतला. बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोच्या मांडीवरच त्याने प्राण सोडला..अंधाराचा फायदा घेऊन बाळकृष्ण पसार झाला.. थोडा वेळ शान्तता पसरली.. पुन्हा घोड्याच्या टापांचा आणि चाबकाच्या फटक्यांचा आवाज.. पुन्हा आरोळी..'गोंद्या आला रे..'..'गोंद्या आला रे..' अरे हे काय झालं? म्हणजे मगाशी कोणी भलताच यमसदनी गेला. ही गोष्ट दामोदर हरि चापेकरांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी बग्गीचा पाठलाग केला, पिस्तुलाचा चाप ओढला.. फ़ाट.. फ़ाट आवाज आले.. अतिषबाजी सुरूच असल्यामुळे अंधारात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. बग्गी तशीच पुढे निघून गेली.
काम फत्ते झाल्याच्या आनंदात रात्रभर कोणाला झोप लागली नाही. २३ ला सकाळी १०-११ च्या दरम्यान शहरातून बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली..प्लेग कमिशनर रैण्डवर गोळीबार.. जबर जखमी, ससूनमध्ये मृत्यूशी झुंज, अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात लेफ्टनंट आयर्स्ट जागीच ठार..शहरात जल्लोष सुरु झाला. अनेकांनी साखर वाटली. शेकडोंच्या मनातील इच्छेला क्रांतिकारी रक्ताने मूर्त रूप दिले होते.. "गणेशखिंडीतील गणपती पावला.. बळवंतराव.." दामोदर हरि चापेकरांनी लोकमान्यांना आनंदाने ही बातमी दिली... "हो, समजलं ते मला.. आता सगळे जपून राहा.." स्वातंत्र्य संग्रामाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या आशीर्वादाने सर्वांना कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. शस्त्रे एका विहिरीत टाकून, नकळतपणे मुंबईला प्रयाण केले. ३ जुलैला रैण्डने ससूनमधेच प्राण सोडले.
पुढे बक्षिसाच्या मोहापायी द्रविड बंधूंनी चापेकारांविषयी पोलिसांना माहिती दिली आणि त्यात दामोदर चापेकर पकडले गेले. या देशद्रोह्यांनाही शिक्षा व्हायला हवी म्हणून धाकट्या वासुदेवने रानडे आणि साठे यांच्या मदतीने द्रविड बंधूंनाही यमसदनाला धाडले. एक चक्र पूर्ण झाले. १८ एप्रिल १८९८ ला दामोदर हरि चापेकर, ८ मे १८९९ ला वासुदेव हरि चापेकर, १० मे १८९९ ला महादेव रानडे आणि १२ मे १८९९ ला बाळकृष्ण चापेकरांना येरवडा जेलमध्ये  फाशी देण्यात आले.      
--------------------------------------------------------------------------------
२२ जून २०११
चिंचवडवरून निघून रात्री दीडच्या सुमारास गाडी विद्यापीठावरून चालली होती. ब्रेमेन चौकातील झगमगाटानंतर कोंक्रिटच्या रुंद रस्त्यावरून गाडीने आणखी वेग घेतला. ८० असेल. पण आमच्या त्या वेगालाही ओलांडून इतर गाड्या आणखी वेगाने काही सेकंदात दिसेनाशा होत होत्या. दोन- एक मिनिटात गाडी विद्यापीठ चौकात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर काही पोलीस आणि पार्क केलेल्या काही गाड्या होत्या. फ्लायओव्हरच्या खालून सर्व दिशांनी अजूनही गाड्यांची ये- जा सुरूच होती. वैकुंठ मेहताजवळ थांबून उजवीकडे खिंडीतला गणपती दिसतो की नाही ते पहायचा प्रयत्न केला, पण बरेच प्रयत्न करून एका पॉईन्ट वरून फक्त कळस दिसला. गाडी पुढे सरकली.. एनआयसी, एचडीएफसी- एक्सिसच्या मोठ्या इमारती, आणखी पुढे गेल्यावर नव्या मोठ्या मॉलचे काम सुरु होते. समोर सुरु होणाऱ्या दुसऱ्या फ्लाय ओव्हरच्या खालूनच गाडी घेतली. खाली किमान ५०-६० कार्सची रांग लागली होती. त्यात जगातील सर्व नामवंत ब्रांडच्या गाड्या होत्या. 'ई- स्क्वेअर'चा नाईट- शो अजून संपायचा होता. सिनेमाच्या पोस्टरवर नजर टाकली..भिंडी बाजार, एक्स मेन, आणखीही बरेच होते.. २५-३० रिक्षावाले शो संपायची वाट पाहत होते.. गाडी पुढे आली, डावीकडे कृषी बैन्किंग महाविद्यालय लागले.. गाडी हळू केली. माझी नजर त्याच्या भिंतीच्या जवळून गाडीच्याच वेगाने सरकू लागली. भिंतीला लागून फुटपाथ आहे. त्याच्या मधेच एक छोटासा मंडप घालून लोकांनी लक्ष्मी मंदिर म्हणून नाव दिले आहे. कृषी बैन्किंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरवर येऊन गाडी थांबवली. हेच ते ठिकाण होते, जिथे दामोदर हरि चापेकरांनी रैण्डवर गोळ्या झाडल्या होत्या. दामोदर हरि चापेकारांचा अर्धाकृती पुतळा आणि फासावर गेलेल्या इतर तिघांचे म्यूरल रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात निरखू लागलो. खाली काहीतरी माहिती दिली होती. पण, पुसली गेल्याने ती वाचता आली नाही. थोडा मागे चालत गेलो.. कृषी बैन्किंगच्या भिंतीच्या कडेला अनेक वर्षे एक स्मृतीशीळा होती. रैण्ड आणि आयर्स्ट यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्याच्या  स्मृतीप्रीत्यर्थ तेथेच इंग्रजांनी ती बसवली होती. इंग्रजांसाठी ती शीळा जशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्मृतीसाठी महत्वाची होती, तशीच भारतीय तरुणांसाठी ती अभिमानाची होती. भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या सशस्त्र लढ्याच्या प्ररम्भाचे ती प्रतिक होती...
काळ सरला तसे गणेशखिंड रस्त्याचे रूपच पालटले. पूर्वीचे जंगल आता शहरातील सर्वात झगमगीत रस्त्यात बदलले आहे. शहरातील तरुणाईच्या सेलीब्रेशनचे ते एक मुख्य केंद्र आहे. त्यामुळे या रस्त्याच्या शोभेआड येणाऱ्या सर्व गोष्टी हटवण्याच्या मॉलधारकांच्या मागणीला महापालिकेनेही तत्पर प्रतिसाद दिलेला दिसतो.. म्हणूनच की काय, ती ११३ वर्षे जुनी स्मृतीशीळा मला शोधून सापडली नाही. चापेकरांच्या पुतळ्याच्या बाजूला फूटपाथच्या मधूनच एक कोरीव दगड अर्धवट वर आलेला मात्र दिसला.
मी गाडी सुरु करून निघालो तो पर्यंत ई स्क्वेअरचा नाईट शो संपून त्या ब्रांडेड गाड्या हॉर्न वाजवत वेगाने शहराच्या पूर्वेकडे निघाल्या. २२ जून १८९७ ला घोड्याच्या टापांचा, घुंगराचा आणि चाबकाच्या फटाक्यांचा आवाज करीत साहेबाच्या बग्ग्या याच रस्त्यावरून पूर्वेकडे धावल्या होत्या.